Tuesday, August 4, 2009

हमको मिटा सके ये, जमाने दम नहीं हमसे जमाना खुद हैं, जमाने से हम नहीं

हमको मिटा सके ये, जमाने दम नहीं
हमसे जमाना खुद हैं, जमाने से हम नहीं

जिगर मुरादाबादींचा हा एक शेर आहे. याचा अर्थ "या जगाला वाटलं आणि म्हणून जगानं आम्हाला धुळीला मिळवलं हे कदापिही शक्य नाही, कारण हे जग आम्हीच निर्माण केले आहे, घडवलं आहे, जगाचे अस्तित्व आमच्यामुळे आहे, जगामुळे आम्ही आहोत असे नाही'.
काल आमचे सहकारी आणि "मुंबई मित्र', "वृत्तमित्र' चे कार्यकारी संपादक राजेश सावंत यांच्यावर मध्यरात्री जो प्राणघातक हल्ला झाला, त्यानंतर जिगर मुरादाबादींचा हा शेर सर्व प्रथम आम्हाला आठवला. लढण्याचा आमचा इरादा अधिकच बुलंद झाला. "फाईट बॅक' करण्याची आमची इच्छा उसळून आली. आम्ही आमच्या विरोधकांना नेहमीच बजावत असतो की आम्ही "अभिजीत राणे' आहोत हे विसरु नका. आम्ही कुणा डरपोक पत्रकारासारखे गांडूळ नाही. आम्ही फणा उगारलेले शेष आहोत. आम्ही पत्रकारितेतील फेकलेले हाडूक चघळत बसणारे लाचार कुत्रे नाही. आम्ही हत्तीचेही गंडस्थळ फोडण्याची हिंमत असलेले शेर आहोत. आम्ही पत्रकारितेत बेडुकउडया मारण्यासाठी आलेलो नाही तर गरुड भरारी घेण्यासाठी आलो आहोत. याल अंगावर तर घेऊ शिंगावर या बाण्याने वागणारा हा "अभिजीत राणे' आहे. "ईटका जवाब, पथ्थरसे देना हम जानते है'
कृष्णबिहारी नूर या शायरचा एक भावपूर्ण शेर आहे, नूर म्हणतो...
मै जिस के हाथ मे
इक फूल देके आया था
उसी के हाथ का पथ्थर
मेरी तलाश मे है !!
आमचे सहकारी राजेश सावंत यांच्या वरील हल्ल्यामागे कोण असू शकतात याचा आम्हाला अंदाज आहे. आम्ही ज्यांना "फुले' दिली तेच जर आमच्यावर असे दगड फेकणार असतील तर त्यांनी इकबाल हमी याचा पुढील शेर लक्षात ठेवावा...
लहू क्यों आज सर से
रिस रहा है तुम जरा सोचो
यकीनन कल तुम्हारे हाथ मे
पथ्थर रहा होगा ।।
आज तुमच्या डोक्याला रक्ताची धार लागली आहे. पण ती का लागली याचा विचार करा. काल नक्की तुमच्या हातात दगड असला पाहिजे, तुम्ही काल कुणाला तरी जखमी केले असले पाहिजे.
आम्ही ज्यांच्यापुढे दोस्तीचा हात पुढे केला तेच जर "दोस्त, दोस्त ना रहा' असे वागणार असतील तर तासीर या शायरचा शेर त्या शत्रू झालेल्या मित्रांनी लक्षात ठेवावा...
सोचकर कोई
दोस्ती तोडना
टूटकर पत्ते
हरे नही होते ।।
मैत्रीचे संबंध तोडण्यापूर्वी दहा वेळा विचार करा. कारण एकदा ते तुटले की कायमचेच. मग इच्छा असली तरी ते पुन्हा पहिल्यासारखे होणार नाहीत. पिवळी गळून पडलेली पाने, पुन्हा कधी हिरवी झाली आहेत काय? आम्ही नेहमी म्हणतो की, "अभिजीत राणे' सारखा मित्र जगात नाही पण हेही लक्षात ठेवा शत्रूत्व घ्याल तर "अभिजीत राणे' सारखा शत्रूही दुसरा असू शकत नाही. "दिलवर के लिये दिलदार है हम, दुष्मन के लिये, तलवार है हम' हा आमचा स्वभाव आहे. आम्ही माणसांवर विश्र्वास ठेवतो. कारण जॉंनिसार अख्तरचा एक शेर आमचे विचारसूत्र आहे. तो म्हणतो-
हरचंद एतबार मे
धोके भी है मगर
ये तो नही किसी पे
भरोसा किया न जाए ।।
एकादयावर विश्र्वास ठेवण्यात विश्र्वासघात होण्याचा धोका असतो, हे जरी खरं असलं तरी याचा अर्थ थोडाच असा आहे की कुणावर विश्र्वासच ठेवू नये? कधी कधी ज्यांच्यावर आपण उपकार केले, ज्यांना प्रसिध्दी दिली तेच नेते मत्सर, व्देष, असूया, स्पर्धा यामुळे क्षुद्र मनाने वागताना दिसतात तेव्हा फिराक गोरखपुरी यांच्या शब्दात म्हणावसं वाटतं...
इन्सानियत की रोशनी
गुम हो गई कहॉं,
साये है आदमी के
पर आदमी कहॉं ?।।
या जगातून माणुसकीचा प्रकाश कुठे लुप्त झाला आहे. मग हे जगात वावरत आहेत, त्यांना माणूस का म्हणायचे? या तर माणसांच्या केवळ सावल्या आहेत.
राजकीय स्वार्थासाठी नेते असे कृतघ्नपणे वागताना पाहिले की मनात येते...
दिखावे के है सब
ये दुनिया के मेले,
भरी बज्म मे हम
रहे है अकेले ।।
हे जग म्हणजे माणसांची जत्रा आहे असं म्हणतात. पण मला तर ते खरं वाटत नाही. या माणसांनी भरलेल्या राजकीय गर्दीत मी मात्र एकटा राहिलो आहे.
अर्थात म्हणून आम्ही निराश नाही, हताश नाही, उदास नाही. हे जग बदलण्याची हिंमत आमच्यात आहे. जरी आम्ही म्हणतो की
दोस्त कहकर
मुझे न दे गाली,
दिल पे इक
जख्मे-दोस्ती है अभी ।।
"तू कृपा करून मला दोस्त म्हणू नकोस, दोस्तांकडूनच घायाळ झालेल्या मला दोस्त ही शिवी वाटते'.
ही परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आमच्यात आहे. इतके दिवस दोस्ती अनुभवलीस आता दुश्मनी बघ आमची असे ठणकावण्याचे सामर्थ्य आमच्यात आहे. आम्ही मानतो की...
अगर बदल न दिया
आदमी ने दुनिया को,
तो जान लो की यहॉं
आदमी की खैर नाही ।।
या शेरमध्ये फिराक गोरखपुरी म्हणतात. आत्ताचं हे जग माणसाने रहाण्याच्या योग्यतेचे उरलेले नाही. याला कारण माणूसच आहे. हे जाणून माणसाने वेळीच योग्य ते बदल या जगात घडवून आणले नाहीत तर मग माणसांचे काही खरे नाही.
राजेश सावंत यांच्यावरील हल्ला हा अभिजीत राणे यांच्यावरील हल्ला आहे असेच आम्ही मानतो. राजेश सावंत हे एक सभ्य, सुसंस्कृत, सज्जन, मेहनती पत्रकार आहेत. त्यांनी कधी कुणाला त्रास दिलेला नाही. राजेश सावंत यांना शत्रू नाहीत. आम्हाला आहेत. आमच्या वाटयाला थेट जाण्याची ज्यांची हिंमत नाही. अशा नामर्द, भ्याड गिधाडांनी आमच्यावरील राग आणि सूड राजेश सावंत यांच्यावर काढला हे स्पष्ट आहे. वार राजेश सावंत यांच्यावर झाले तरी तलवारीचे पाते आमच्यावर रोखलेले होते. राजेश सावंत यांच्यावर झालेला नीच हल्ला हा अभिजीत राणे यांना इशारा देण्यासाठी होता यात शंका नाही. राजेश सावंत यांनी निःशस्त्र असून या सशस्त्र हल्ल्याचा धैर्याने, शौर्याने प्रसंगावधान राखून एकटयाने जो प्रतिकार आणि मुकाबला केला त्याबद्दल त्यांना शौर्यपदकच दयायला हवे. राजेश सावंत यांच्यामागे आम्ही भरभक्कमपणे उभे आहोत. वर्तमानपत्र सृष्टी उभी आहे.
कांदिवली पोलिसांना विशेष धन्यवाद दयायला हवेत. त्यांनी गांभीर्याने या प्रकरणाची नोंद, दखल, चौकशी केली. योग्य त्या कलमांखाली गुन्हयांची नोंद केली. यापुढेही ते तडफदारपणे कारवाई करतील याची आम्हाला खात्री आहे. गोरेगावातील आगामी विधानसभा निवडणुकीतील आमच्या भूमिकेशी या हल्ल्याचा संबंध असावा आणि एका कामगार नेत्याची या मागे चिथावणी असावी असा संशय अनेकांनी आमच्याशी व्यक्त केला आहे. एका राजकीय पक्षाचे आपण नेते आहोत असा दावा करणाऱ्या या कामगार नेत्याने गेल्या काही दिवसांपासून गोरेगावातील वातावरण प्रदूषित करण्याचा आणि कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन आम्हाला सामाजिक सांस्कृतिक कामातही उपद्रव निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. या चिथावणीखोर राजकीय कामगार नेत्याने राजेश सावंत यांच्यावरील इशारा हल्ल्यासाठी सुपारी दिली असावी असा संशय गोरेगावातील अनेक जाणकारांनी बोलून दाखवला आहे. आमचा पोलिसांवर विश्र्वास असल्याने आणि ते योग्य दिशेने तपास करीत असल्याने आम्ही तूर्त या कामगार नेत्याचे नाव घेऊन त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलेले नाही. ते काम पोलिसांचे आहे. आम्ही एवढेच म्हणतो की...
हम को मिटा सके ये
जमाने मे दम नही
हमसे जमाना खुद है
जमाने से हम नही।।

No comments:

Post a Comment